ऋतू.. बहरता बहरलेला..!

पियुष प्रकाश खांडेकर (मृदुंग / क्षण)

प्रत्येक गोष्टीची सुरुवात पावसापासून होते. तशीच पावसापासून प्रेमाची सुरुवात होते. आपण मात्र उगाच अंतर ठेवतो. हा योग की, योगायोग या संभ्रमात कर्म करत राहतो. कितीतरी पावसाळे सरुन गेले असतील. पावसाचा आणि कुणाचा प्रेमळ योगायोग जुळून आलेला नसेलच. मनात एक असतं. ओठांवर अनेक असतं. पावसासोबत ओघळलेलं तारुण्य नवं असतं, हवं असतं. स्वप्नच असतं हेही एक. वास्तवात उतरत नाही तोवर भाकड कल्पनेत रमले असते. वास्तवाची जाणिव करुन द्यायची म्हटलं की, सगळंच पुन्हा आलबेल करुन जाणारं सत्य असतं.

..चौफेर चोखंदळ जगायचं तरीही असतं.

..आपलं आयुष्य आपण सावरायच असतं.

..दूषणं भले मग कितीही लागोत, हृदयावर आघातांची आभूषण मिरवत जगायचं असतं.

रोज हृदयाची आहुती देणारे वेगळे नसतात. स्वप्नांची चिता पेटवून हात शेकणारे आपलेच असतात. कालांतराने हसण्यावर उडालेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट प्रेमाचीही असते. सांगायची म्हटलं की, दातखिळी बसते. जगायची म्हटलं की, जीवावर येते. सोडून द्यायची म्हणताच, पुन्हा नव्याने गोष्ट रंगू लागते. करायचं काय? उगाच काय? म्हणत एक गोष्ट बनते. तिला फोडणी, खतपाणी आणि आहुतीही नियतीची खेळी टाकत राहते. अशावेळी आपण हतबल होण्याव्यतिरिक्त काहीएक करु शकत नसतो. शिवाय पुढे अख्ख आयुष्य पडलंय म्हणत निव्वळ चालढकल करत राहतो. पश्चातापच्या यज्ञात स्वतःचा बळी देऊन थोर पुण्य कमावलं या अविर्भावात जगत राहतो.

..चुकलं कुणाचं? कधी? कशामुळे? सतत शोध घेत राहतो.

..काही उत्तरे एखादवेळी सापडतातसुद्धा. पण प्रश्न अर्थहीन झालेली असतात.

..कळलं कसं नाही तेव्हा? उत्तरच असतं एक स्वतःला दिलेलं. पण जाब स्वतःचीच बुद्धी मागते.

..गोंधळ अजून किती होणार? झालेला गुंता सोडवता-सोडवता जरा जास्तच गुंतत जातो. आपण!

..पण काही म्हणा, आठवलं ते सगळं की मोरपीस फिरतोच आणि एक सल मनात खोल रुतते.

..वेदनेच्या अथांग सागरात एकटेपणाचे मनोरे हेलकावे खात असतांना; गुन्हेगार दोष स्वतःला देतात. शिक्षा जग ठरवून देत असते.

भोग उपभोगण्याची मनाची संपूर्ण तयारी झाली असतेच की, तेवढ्यात..

..तेवढ्यात, ऋतू बदलण्याचा नियम अचूक पाळून घेतो..

..बाहेर रिपरिप पावसाला सुरुवात होते. धरणीचा दाह एका क्षणात सुगंध होऊन दरवळू लागतो.

..भर पावसात अश्रू लपविण्याची आयती संधी दडवता येत नसते.

..क्षणभराचा मोह सर्वस्व लुबाडून घेतो. पदरात उरते ते स्वतःच्याच ओंजळभर स्वप्नांचे दारिद्र्य.

..स्वतःच अनाकलनीय गूढ वास्तव.

..नुकताच पाऊस येऊन गेला. अर्थात तो पाहुणा आल्यागत वागलासुद्धा.

..मी म्हटलसुद्धा त्याला हे असं उभ्या उभ्या येऊन जाणं शोभत नाही.

..त्याच उत्तर म्हणजे आभाळात गडगडणं. वेंधळ्या वाऱ्याने गारठा लपेटून संपूर्ण शरीराला अल्हादाने अच्छादण.

..एकतर पाऊस वेळ सांभाळत नाही. निसटत्या थेंबांवरचा निरोप वाचत नाही.

..आरोप करायचे म्हटलें की, हा खुशाल दडी मारुन पसार.

..मग स्वतःच मन हलकं करायचं तरी कुठे? आणि कुणाकडे?

..मतलबाच्या या युगात सभ्यतेचे औदार्य दाखवतांना निसर्गही बेशिस्त वागतो.

तेव्हा माणसांची खुशामत करायला आणि खुशाली विचारायला वेळ कुणाकडे असतो?

..आल्यापाऊली माघारी फिरायची एक रीत झालेली आहे. या रितीच भाग्य असं की, प्रतिष्ठित असणं कर्तब झुगारण्यात सामावलेलं आहे.

कॅलेंडरच्या पानांवर कितीतरी वर्षे उलटून गेलेली आहेत. आताही एक वर्ष अगदी सहज उलटण्यात आलं आहे. दिवसांचा खेळ अवघ्या तासांच्या हिशेबावर येऊन ठेपला आहे. यात काही बदललेलं आहे. तर ते म्हणजे पूर्वीसारखा उत्साह आणि आनंद उरलेलाच नाही.  बेत आखायचे म्हटले की, कितीतरी रेषा कधीच खोडल्या गेलेल्या आढळत असतील. यांचा हिशेब लावता-लावता पुन्हा ओरखडे पडतीलच.

..जाऊ द्या. कसंय ना काही केलं तरी त्याला अर्थ नाही.

..काही वेगळं असं केलं नाही तरीही ते अर्थहीनच गृहीत धरलं गेलंय.

..त्यापेक्षा नकोच या नुसत्या उठाठेवी.

सामान्य दिवसासारखाच एक दिवस समजून घ्यायचा आणि पुढे चालत यायचं.

..मागे नजर गेलीच तर फिरलेली तोंड आणि बदललेल्या वाटांनी स्वतःची विषन्न अवस्था करुन घ्यायची.

..या हतबलतेशिवाय आपल्याला अजून काहीएक चांगलं अजूनतरी जमलं नाही.

मग कशाला ना पुन्हा अपेक्षांच्या झुल्यांना झुलवायच?

..सुंदर आयुष्याची फुलवलेली अख्खी बाग डोळ्यादेखत स्वतः आपणच जाळून टाकल्यावर स्वप्नांना गांभीर्य कशाचे आणि का वाटणार?

..जगण्याची तात्पर्य शोधण्यात आपला वेळ तसाही कसा निघून जातो? हे कळत नसल्यावर आणखीन काही आहे वेगळं या जगण्यात. हे सापडत कुठे? कळतं तरी केव्हा?

..तुला कळणार नाही, म्हणत आता माझं मलाच काही एक कळेनासं झालेलं आहे.

..तुला सगळं सांगायचं. मन व्यक्त करुन अबोल होयचं. हे आता फारसं सहज जमत नाही. माझ्याव्यतिरिक्त कुणाला फारसा मी समजत देखील नाही.

..मग अख्ख जग माझ्या विरोधात जाऊन बसले तरी मला त्याची पर्वा नसतेच.

..चौकटीच्या मर्यादेतून काही गोष्टी पाहिल्या की, सगळं व्यवस्थित वाटत असतं. याच गोष्टींना प्रेमाच्या भिंगातून पाहिलेस की, समजतं! सूर्याची किरणे हृदयावर एकवटून आग केव्हाच लागून गेलेली आहे.

..अंधारात आणि आधारात उठाठेवींचा एवढाच फरक असतो.

..त्यामुळे या नुसत्या उठाठेवी आता बंद.

..बंद म्हणजे बंदच!

क्रमशः

(लेखाचे संपूर्ण वृत्तांत काल्पनिक असून त्याचा कुठल्याही जीव, जंतू, प्राणी व धर्माशी काही एक संबंध नाही. जर काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

___________________________________________________________

लेखक पियुष प्रकाश खांडेकर हे “मृदुंग” या अधिकृत टोपण नावाने लिखाण करतात. “क्षणातच”च्या बँनरखाली त्यांनी चारोळ्या, गझल, लघुकथा, दीर्घकथा, लेखमालांसह विविध कमर्शिअल, नॉन-कमर्शिअल जाहिरातीचे मजकूर लिहले आहेत. आपण लेखकाला [email protected] वर संपर्क साधू शकता.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!