तरुणांनी हटवला गड्डे बंगल्याजवळचा स्थानिक निर्मित कचरा डेपो

रमेश कांबळे, प्रतिक कांबळे

स्वच्छता राखणे, आपला परिसर नीटनेटका ठेवणे कोणा एकाचे काम नाही, यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असते, हेच ध्येय समोर ठेवत आयआयटी, पवई येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील तरुणांनी पुढाकार घेत स्थानिक निर्मित माता रमाबाई नगर व चैतन्यनगर येथील गड्डे बंगल्याजवळचा कचरा डेपो साफ करत परिसर कचरामुक्त केला.

पंचशील म्युजिकल ग्रुपच्या अनिल बिरारे, निलेश अहिरे, गणेश गायकवाड, किशोर गायकवाड, गौरव जोगदंड, सुरेश पंडागळे, समीर पंडागळे, अविनाश पंडागळे, कुणाल इनकर, प्रशांत आंगरे, अतुल गाडे, अतुल पंडागळे, अनिकेत जगताप, बाबु पंडागळे या तरुणांनी पुढाकार घेवून येथील कचऱ्याची विल्हेवाट लावत आपला परिसर स्वच्छ केला. पुन्हा येथे कचरा टाकला जावून कचरा डेपो तयार होवू नये म्हणून २४ तास विविध माध्यमातून येथे तरुणांकडून नजर सुद्धा ठेवली जाणार आहे.

पालिका, निवडून दिलेले स्थानिक प्रतिनिधी, नेते मंडळी यांना बगल देवून तरुणांनी आपला परिसर स्वतः साफ करत यांच्या सणसणीत कानाखाली देत आता पुढच्या वेळी तुमची साफ होण्याची बारी आहे असा संदेशच या कार्यातून दिला आहे.

आयआयटी परिसर हा बैठ्या चाळींचा परिसर, पवईतील सर्वात जुन्या परीसारांपैकी एक आहे. मात्र, आजही येथील नागरिक प्राथमिक समस्यांसोबत लढत आहेत. कचऱ्याची विल्हेवाट ही त्यातील एक मोठी समस्या आहे, ज्याच्यासोबत आजही येथील जनता लढत आहे. अनेक परिसरात कचरा गाड्या पोहचत नसल्याने रोड, परिसराचे कोपरे येथे कचऱ्याचे ढिगारेच्या ढिगारे पडून असतात.

प्रमुख रस्त्यांवरूनच घंटागाडी फिरत असल्याने आसपासच्या डोंगराळ परिसरात राहणाऱ्या लोकांनी चैतन्यनगर येथील गड्डे बंगल्याजवळ कचरा आणून टाकण्यास सुरवात केली होती. हळू हळू त्याचे कचरा डेपोत कधी रुपांतर झाले कोणाला कळालेच नाही.

हळू हळू त्यामुळे दुर्गंधी, आजार पसरू लागल्याने स्थानिकांना त्रास जाणवू लागल्यानंतर याला हटवण्याची स्थानिकांनी मोहीम चालू केली. मात्र निगरगट्ट झालेले पालिका प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधी यांनी मात्र या समस्येकडे सपशेल पाठ फिरवली. सत्ता पालट करण्याच्या उद्देशाने अनेक इतर पक्षाच्या लोकांनीसुद्धा यात उडी घेत आम्हाला तक्रार करा आम्ही निवारण करतो म्हणत यात उडी मारली पण त्यांच्याच्याने पान सुद्धा नाही हलले कचरा डेपो तर दूरच.

अखेर आपला परिसर नीटनेटका स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी जबाबदारी स्विकारत पंचशील म्युजिकल ग्रुपच्या तरुणांनी पुढाकार घेत संपूर्ण कचरा उचलून परिसर साफ करून घेतला आहे. तसेच ‘येथे कचरा टाकू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल’ अशा सूचनेचे फलक सुद्धा लावण्यात आले आहेत. विविध माध्यमातून येथे कचरा टाकला जाणार नाही याचवर हा ग्रुप नजर ठेवून असणार आहे.

संपूर्ण पवईतून या मुलांवर शाब्बासकीचा वर्षाव होत असून, इतर भागातील तरुणांनी सुद्धा यातून पुढे येवून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी उचलण्याची मागणी होत आहे.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!