मेट्रो – ६ प्रकल्पाला सामाजिक कार्यकर्त्यांनी सुचवला पर्यायी मार्ग

मुंबई मेट्रो – ६ प्रकल्प (स्वामी समर्थनगर-लोखंडवाला कॉम्प्लेक्स-विक्रोळी) नियोजनच मुळात चुकीचे आहे. स्टेशनची जागा, पर्यावरण रक्षणासाठी उपाय-योजना, जेव्हीएलआरवरील वाहतूक कोंडी अशा अनेक समस्या उद्भवणार असल्याने नागरिकांनी याला विरोध करत भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या मागणी अंतर्गत पर्यायी मार्ग सुचवला आहे.

आता कार्यान्वित असणारा प्रकल्प हा वाहतूक कोंडी, निसर्गाचे नुकसान करणारा असून याला पवईकर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) आपला पर्यायी प्रस्ताव मांडला आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवरून पवई मार्गे जाणाऱ्या मेट्रो-६ प्रकल्पाचे बांधकाम कार्य डिसेंबर २०१८ पासून सुरु झाले आहे. मात्र संभाव्य समस्या पाहता यापूर्वीच या मार्गावरील मेट्रो प्रकल्प हा जमिनीवर बनवण्याऐवजी भूगर्भीय (अंडरग्राउंड) करावा अशी मागणी नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र मेट्रो – ६ प्रकल्पाच्या कॉरिडोरच्या निर्मिती कामाच्या सुरू करण्याच्या जवळजवळ सहा महिन्यानंतर अखेर एमएमआरडीएने याबाबत नागरिकांचा सल्ला मागितला होता.

जनमत विचारात न-घेता प्रकल्पाचे काम सुरु करून सहा महिने उलटल्यावर प्राधिकरण लोकांकडून सल्ले मागत असल्यामुळे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते नाराज झाले होते. बांधकाम सुरू केल्यानंतर लोकांचा सल्ला विचारणे केवळ कागदपत्रांच्या बाबतीतील औपचारिकता असल्याचा आरोपही त्यांच्याकडून केला जात आहे.

आता चालू असणाऱ्या मेट्रो – ६ प्रकल्पाच्या नियोजनानुसार योजना जर कार्यान्वित केली गेली तर आधीच वाहतूक कोंडीच्या जाळ्यात असणाऱ्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवर (जेवीएलआर) परिस्थिती जास्तच खराब होईल. पवई तलावाची शांतता भंग होईल.

विस्तृत प्रकल्पाच्या अहवालात पवई तलाव, महाकाली गुंफा किंवा सीआरझेडमध्ये येणाऱ्या क्षेत्रांवर पर्यावरणाच्या होणाऱ्या परिणामाविषयी चर्चा केली नाही असेही याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

मेट्रो – ६ सध्याच्या नियोजनाला विरोध करतानाच आर्किटेक्ट नितीन किलावाला यांनी नवीन कल्पना मांडली आणि रहिवाशांच्या बैठकीत चर्चा केली.

अंडरग्राउंड प्रकल्प असणाऱ्या मेट्रो-३ कॉरिडॉरला (कोलाबा-बांद्रा-सिप्झ) जोडून ६ किलो मीटरचा विस्तार यात सूचित करण्यात आला आहे. मरोळनाका येथून साकीविहार मार्गे चांदिवली आणि हिरानंदानीच्या पाठीमागून विक्रोळी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत पोहोचेल.

अशाप्रकारे ही लाइन आधीच वाहतूक कोंडीत अडकलेल्या जेव्हीएलआरवर येणार नाही आणि पवई तलावाच्या निसर्ग सौंदर्याचे सुद्धा रक्षण होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!