चांदिवलीत मिनी अग्निशमन केंद्र सज्ज

चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार या परिसरात घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना रोखण्यासाठी चांदिवली येथे नुकतेच मिनी अग्निशमन केंद्राचे उदघाटन करण्यात आले आहे. स्थानिक आमदार अरिफ नसिम खान यांच्या हस्ते शनिवारी लेकहोम समोर बनवण्यात आलेल्या या मिनी अग्निशमन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. विभागीय अग्निशमन अधिकारी हरीश शेट्टी, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी ई बी मताले, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी पी आर परुळेकर, प्रभारी अधिकारी (मरोळ) एम एच सोनावणे, लेक होम फेडरेशन अध्यक्ष मिलिंद मोंडकर, फेडरेशन सचिव मझर ठाकूर आणि मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.

चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार परिसरात गेल्या काही वर्षात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणत वाढल्या असतानाच यासाठी अग्निशमन दल मरोळ किंवा विक्रोळी भागातून पाचारण करण्यात येते. लेकहोमच्या घटनेमुळे तर संपूर्ण मुंबईला हादरवून सोडले होते. अग्निशमन यंत्रणेला पोहचायला लागलेला वेळ आणि सुविधांच्या कमतरतेमुळे अनेक निष्पाप लोकांना या आगीत आपले प्राण गमवावे लागले होते.

लेकहोमच्या घटनेनंतर चांदिवली आणि पवई परिसरात आगीच्या घटनांची जशी लडीच लागली होती. त्यातच परिसरांपासून अग्निशमन केंद्र खूपच लांब असल्याने घटना घडल्यानंतर अग्निशमन यंत्रणेची तत्काळ मदत पोहोचू शकत नाही. प्रत्येक वेळेस मरोळ आणि विक्रोळी वरून येणाऱ्या अग्निशमन दलांच्या गाड्यांमुळे जीव टांगणीला लागून राहणाऱ्या स्थानिकांकडून परिसरातच अग्निशमन केंद्र उभे करण्याची मागणी होत होती.

“पवई आणि चांदिवली परिसरात दीड लाखाहून अधिक कुटुंबे राहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून येथे आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आमच्या येथे लेकहोममध्ये घडलेल्या अग्निकांडात तर विनाकारण लोकांना जीव गमवावा लागला होता. उंचच्या उंच इमारतीचे माहेरघर असणाऱ्या आपल्या या परिसरात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरुवातीची मदत मिळावी म्हणून मिनी अग्निशमन केंद्र उभे करावे अशी मागणी आम्ही तेव्हापासून स्थानिक आमदार आणि सरकार दरबारी करत होतो. अखेर आमदार नसीम खान यांनी त्याचा पाठपुरावा करत आमच्याच कॉम्प्लेक्ससमोर असणाऱ्या पालिकेच्या मोकळ्या जागेत हे केंद्र उभारण्यात आले आहे” असे याबाबत बोलताना लेकहोम फेडरेशनचे सचिव आणि फेज ३ चे अध्यक्ष मजहर ठाकूर यांनी सांगितले.
कसे आहे केंद्र

मरोळ अग्निशमन केंद्राचे विस्तारीत रूप असणाऱ्या या मिनी अग्निशमन केंद्रात एक सर्व सोई-सुविधांनी सज्ज असे छोटे फायर इंजिन आणि अग्निशमन जवान कार्यरत आहेत. अग्निशमन विभागाला पवई, चांदिवली भागात लागलेल्या आगीची माहिती मिळताच त्वरित हे फायर इंजिन घटनास्थळी पोहचून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु करेल. मुख्य केंद्रातून मदत मिळेपर्यंत जवळपास एक तास आगीशी सामना करण्याची क्षमता या फायर इंजिनमध्ये आहे.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!