रिक्षा चोरीच्या संशयातून पेटवले घर

प्रातिनिधिक छायाचित्र

रिक्षा चोरी केल्याच्या संशयातून रिक्षा मालकांनी ४३ वर्षीय व्यक्तीचे घर जाळल्याची घटना पवईमध्ये घडली आहे. याबाबत पवई पोलिस गुन्हा नोंद करून आरोपींना ताब्यात घेवून अधिक तपास करत आहेत.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, तो पवईतील फिल्टरपाडा भागात राहतो. पवईसह, साकीनाका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. वर्षभरापूर्वी जामीनावर बाहेर आला असून, सध्या चालक म्हणून काम करत आहे.

तो कुपर रुग्णालयात औषधोपचारासाठी गेला असताना त्याच रात्री येथील एका रिक्षा चालकाची रिक्षा चोरीला गेली. ही रिक्षा त्यानेच चोरी केली असल्याचा दावा करत रिक्षा चालक आणि त्याचा मित्राने त्याच्याशी भांडण केले. मात्र तक्रारदार याने रिक्षा चोरी केली नसल्याचे ठणकावले.

“हाच राग मनात धरून रिक्षाचालक आणि त्याचा मित्र या दोघांनी तक्रारदार घरात नसताना त्याच्या घरात घुसून घरातील गृहोपयोगी वस्तू, कपडे, अंथरूण यांना आग लावून घर पेटवले. आग लागलेली पाहताच शेजाऱ्यांनी धाव घेत आग विझवली. याबाबत त्याच्या बहिणीने त्याला माहिती देताच त्याने घर गाठले. त्याने त्या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, आमचा अधिक तपास सुरु आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!