वडिलांवर असणारे कर्ज फेडण्यासाठी अल्पवयीन भावंडे घरातून पळाली

प्रातिनिधिक

आपल्या वडिलांच्यावर असणारे कर्ज फेडण्यासाठी आपल्याला मेहनत केली पाहिजे, हा चंग बांधून साकीनाका येथील आपल्या घरातून पळून गेलेल्या ४ मुलांना सामाजिक कार्यकर्त्यांनी ताब्यात घेऊन साकीनाका पोलिसांच्या मदतीने सुखरूप घरी परतवले आहे. बिहारला जाणारी ट्रेन पकडण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. पळून गेलेली मुले ८ ते ११ वर्ष वयोगटातील भावंडे आहेत.

गोलू अनिल शाहू (वय ९), लकी विनोद पांडे (वय ८), कमलेश चंदकिशोर कामत (वय ११) आणि कुंदन चंद्रकिशोर कामत (वय १२) अशी त्यांची नावे आहेत. साकिनाका येथील मुरारजी नगर भागात ही सगळी मुले राहत असून, जवळच असणाऱ्या समता विद्यालयात शिकत आहेत.

गुरुवारी संध्याकाळी आपल्या परिसरात खेळत असताना त्यांनी आपल्या वडिलांवर असणाऱ्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व मुलांनी त्यांच्याबरोबर काही कपडे घेतले आणि बसने लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहचले. तिथे पोहोचल्यावर गोलूने बिहारला जाण्याऱ्या ट्रेनबद्दल माहिती मिळवली. त्यानुसार ते दरभंगा एक्सप्रेसने जाण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर पाचवर गेले.

मात्र, उत्सवामुळे भरपूर गर्दी असल्याने मुले ट्रेनमध्ये प्रवेश करू शकली नाहीत. त्यानंतर भांबावलेल्या चेहऱ्याने काय करावे याच्या विचारात असताना सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शिंदे आणि जयश्री खरात यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी मुलांजवळ चौकशी केली असता मुलांनी आपल्या वडिलांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी कामाच्या शोधात पळून जात असल्याचे सांगितले.

मुलांनी आपल्या घरी एक पत्रही सोडले होते, कुटुंबाला त्यांनी आमचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही खूप शिक्षण घेऊन चांगले पैसे कमावून मग घरी परत येऊ असे पत्रात लिहले होते.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!