पवईतील महिलेचा पर्जन्य वाहिनीत पडून मृत्यू झाल्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल महानगरपालिका आयुक्तांना सादर

दुर्घटनेच्या ठिकाणी त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी एमएमआरसीएलचे कंत्राटदार एल ऍण्ड टी आणि एमएमआरसीएल यांची असल्याचा निष्कर्ष

पाठीमागील आठवड्यात मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. यावेळी अंधेरी (पूर्व) येथील सीप्झ परिसरात पर्जन्य जलवाहिनीत पडून पवईतील रहिवाशी विमल अपाशा गायकवाड (४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या संदर्भात मृत महिलेच्या नातेवाईकांनी याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करतानाच एमएमआरडीए आणि पालिका प्रशासना विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सादर केला आहे. सदर घटनास्थळ व परिसर हा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एमएमआरसीएल) कंत्राटदार एल ऍण्ड टी यांचे ताब्यात असल्याने त्याठिकाणी असलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी एल ऍण्ड टी तसेच एमएमआरसीएल यांची असल्याचा निष्कर्ष समितीने या अहवालात मांडला आहे.

मंगळवार, २४ सप्टेंबर सायंकाळ पासून सुरू झालेल्या पावसाने हळूहळू उग्र रुप धारण करत बुधवारी २५ सप्टेंबरला मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला. शहरातील सगळे रस्ते भरून वाहू लागले असतानाच अंधेरी (पूर्व) सिप्झ कंपनीच्या समोरील निष्काळजीपणे उघड्या ठेवलेल्या खड्ड्यात पवईतील मिलिंदनगर येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय विमला गायकवाड पडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधाशोध केल्यानंतर जवळपास दोन तासांनी त्यांना बाहेर काढून कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना दाखल पूर्व मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार, तीन सदस्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय चौकशी नियुक्त करण्यात आली होती. घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त महोदयांनी दिले होते.

परिमंडळ ३चे उप आयुक्त देविदास क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य म्हणून प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर आणि प्रमुख अभियंता (दक्षता) अविनाश तांबेवाघ यांनी या उच्चास्तरीय चौकशी समितीचे कामकाज पाहिले.

या त्रिसदस्यीय समितीने घटनेची सखोल चौकशी करुन निरीक्षणे नोंदवली आहेत व त्या आधारे निष्कर्ष मांडलेला या चौकशी समितीचा आपला अहवाल महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांना सादर केला आहे.

अहवालातील निष्कर्षानुसार, सदर घटनास्थळ व सभोवतालचा परिसर हा सन २०१५ पासून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल)चे कंत्राटदार एल ऍण्ड टी यांच्या ताब्यात आहे. महानगरपालिकेच्या के पूर्व विभागाने प्रत्यक्ष स्थळ पाहणीमध्ये आढळलेल्या त्रुटी कंत्राटदार एल ऍण्ड टी यांना कळवल्या होत्या. त्यावर, दोष दायित्व कालावधी (DLP) मध्ये महानगरपालिकेला काही त्रुटी आढळल्यास त्यांची पूर्तता करण्यास बांधिल आहे, असे कंत्राटदार यांना दिनांक २४ ऑगस्ट २०२४ व २९ ऑगस्ट २०२४ ला पत्राद्वारे एमएमआरसीएल यांना सादर केले होते. एकूणच, दुर्घटनेच्या ठिकाणांच्या त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी एमएमआरसीएलचे कंत्राटदार एल ऍण्ड टी व एमएमआरसीएल यांचीच आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, के पूर्व विभागाच्या अधिकाऱयांनी वेळोवेळी या विषयाबाबत कार्यवाही केली आहे. असे असले तरी दुर्घटना घडली तो रस्ता हा मुख्य रस्ता असल्याने व अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) घोषित असताना महानगरपालिकेच्या विभागातील संबंधित कर्मचाऱयांनी दक्ष राहणे आवश्यक होते, असा निष्कर्ष देखील समितीने मांडला आहे.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!