पवई तलाव ओसंडून वाहू लागला; पवईत सर्वाधिक ३१४ मिमी पावसाची नोंद

शनिवार, रविवार दोन दिवस मुंबईमध्ये पावसाचा तडाखा सुरू आहे. तलाव भागात पडलेल्या जोरदार पावसामुळे सोमवार, ८ जुलैला पवई तलाव तुडूंब भरून वाहू लागला आहे. तलाव ओसंडून वाहू लागल्याची माहिती समजताच पावसात भिजण्याचा आनंद आणि पिकनिक करण्यासाठी सोमवारी पर्यटकांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. धोका पाहता येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तलाव भागात पालिका आणि पोलिसांतर्फे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज (दिनांक ०८.०७.२०२४) पहाटे ४:४५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.

पवईत सर्वात जास्त पावसाची नोंद

रविवारी मुंबईत सुरु असणाऱ्या जोरदार पावसात पवईत सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. पवईत सोमवार सकाळ ६ पर्यंत ३१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर चकाला २७८, आरे २५९, शिवडी १८६ आणि धारावीत १६५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

तलाव क्षेत्रात मुबलक प्रमाणात पाऊस पडला की पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होत असते. जून महिन्याच्या सुरुवातीला हजेरी लावलेल्या पावसाने बराच काळ विश्रांती घेतल्यानंतर शनिवार पासून पुन्हा जोर धरला आहे. शनिवारी आणि रविवारी मुंबई उपनगरात झालेल्या पावसामुळे पवई तलाव भरून, आंबेडकर उद्यान भागात असणाऱ्या डॅमवरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे.

सोमवार सकाळपर्यंत पावसाने सूर धरलेला असल्यामुळे पावसात आणि डॅमवरून पडणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या धबधब्यात भिजण्यासाठी पर्यटकांनी डॅमजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

डॅमवरून पडणारे पाणी पुढे एका कॅनॉलमार्गे मिठी नदीत सोडले जाते. डॅमवर भिजण्यासाठी आलेले तरुण, मुले वाहून गेल्याच्या अनेक घटना या भागात पाठीमागील काळात घडलेल्या आहेत. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये याची खबरदारी म्हणून तलाव भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

निसर्गाच्या या सौंदर्याचा आनंद घेताना दुर्घटना घडू नयेत म्हणून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे येथे येणाऱ्या पर्यटकांना करण्यात आले आहे.

पर्यावरण प्रेमींची नाराजी

पवई तलाव ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये आनंद असला तरी पर्यावरण प्रेमी मात्र नाराज आहेत. जोरदार पावसानंतरही ऑगस्ट महिन्यात भरून वाहणारा तलाव गेल्या काही वर्षात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच ओव्हरफ्लो होत आहे. मात्र तेवढा मोठा पाऊस पडला नसतानाही केवळ सुरुवातीच्या पावसातच तो ओसंडून वाहू लागला असून, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

“करोडो रुपये खर्च करून पवई तलावातील जलपर्णी हटवणे, गाळ उपसण्याचे काम करण्यात आले आहे. अजूनही नवनवीन कामे सुरु आहेत. प्रत्यक्षात मात्र यातील कोणतेच काम व्यवस्थित होत नसून, उलट तलावाची पातळी अजूनच कमी झाली आहे आणि त्यामुळे थोड्या पावसातही तलाव ओव्हरफ्लो होत आहे”, असे यावेळी बोलताना पर्यावरण प्रेमी म्हणाले.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!