जागतिक वसुंधरा दिन: पवई तलाव स्वच्छता आणि संवर्धन अभियानाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेच्या हस्ते सुरुवात

२२ एप्रिल, जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून पवई तलाव स्वच्छता आणि संवर्धन अभियानाला सुरुवात झाली आहे. पर्यावरण, वातावरणीय बदल विभाग आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेच्या नेतृत्वाखाली ही सुरुवात झाली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पवई तलाव भागात वृक्षारोपण आणि पवई तलावातील जलपर्णी हटवण्याच्या कामासाठी हार्वेस्टिंग मशिन चालवत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. राज्यव्यापी पर्यावरण संवर्धन आणि जागरूकता मोहिम २२ एप्रिल ते १ मे (महाराष्ट्र दिन) पर्यंत चालेल.

मंगळवार, २२ एप्रिलला सकाळी ७ वाजता पवई तलाव गणेशनगर गणेश घाट येथे पवई तलाव स्वच्छता व संवर्धन जनजागृती अभियानातून याची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ अविनाश ढाकणे, स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे, पालिका एस विभागाचे सहाय्यक आयुक्त, पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसेवक यांची उपस्थिती लाभली.

या उपक्रमासाठी वनशक्ती, बुऱ्हानी फौंडेशन, पर्यावरण दक्षता मंच, निसर्ग स्वास्थ्य मिशन, हेल्पिंग हॅन्ड फॉर ह्युम्यानिटी, निसर्ग प्रोजेक्ट राईज, न्यास या निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांचे सहकार्य लाभले.

मुंबईतील प्रसिद्ध पवई तलावाची पाठीमागील काही दशकात खूपच दुर्दशा झाली आहे. तलावात सोडले जाणारे सांडपाणी, फेकला जाणारा कचरा, मूर्ती विसर्जन, निर्माल्य विसर्जन यामुळे पवई तलावात प्रदूषण वाढले आहे. सोबतच तलावात जलपर्णीचे साम्राज्य वाढत आहे. १०० कोटीपेक्षा अधिक रक्कम खर्च करून देखील तलावाचे पुनर्जीवन होण्याऐवजी तलावाची स्थिती अधिकाधिक खालावत चालली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, पवई तलावात मगरींचा वावर आहे. याच भागात त्यांची घर आहेत. मगरींची उपस्थिती पर्यटनासाठी वरदान आहे.

पर्यावरणवादी यासंदर्भात बोलताना म्हणाले कि, जलसाठ्यांच्या संवर्धनासाठी केवळ स्वच्छता पुरेशी नाही तर पुनर्संचयित करण्यासाठी, पर्यटकांसाठी प्रवेशयोग्यता आणि विहाराच्या विकासासाठी एजन्सींमध्ये समन्वय महत्त्वाचा आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांना वनशक्तीचे संचालक पर्यावरणवादी स्टॅलिन डी यांनी अलीकडेच पत्र लिहीत पवई तलावाच्या समस्यांवर प्रकाश टाकला होता.

यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम म्हणाले कि, “तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी मंडळ खोलवर अभ्यास करत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी तात्पुरती नाही तर कायमस्वरूपी उपाययोजनेवर आम्ही काम करत आहोत.”

“या तलावाला नवसंजीवनी देण्यासोबतच या परिसरात पर्यटन आणि पर्यावरण वाढीसाठी माझ्या विभागाकडून मला जे काही करणे शक्य आहे ते सर्वतोपरी मी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि येथून पुढेही करत राहणार आहे. येणाऱ्या काळात केवळ पवईकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण मुंबईकरांसाठी हे ठिकाण आकर्षण असणार आहे. आज मी तुम्हाला आश्वासन देते कि केवळ या एका दिवसापुरता किंवा ह्या आठवड्यापुरता हा उपक्रम राहणार नसून, कायमस्वरूपी पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे हे काम चालणार आहे,” अशी हमी यावेळी बोलताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!