अॅमेझॉनने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत मुंबईतील पवई भागात एका मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. शाश्वत पायाभूत सुविधा आणि समुदाय विकासाप्रती आपली वचनबद्धता अधोरेखित करत, अॅमेझॉनने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सोबत मिळून हा प्रकल्प साकारला आहे.
या उपक्रमाचे दोन महत्त्वाचे भाग आहेत. पहिल्या टप्प्यात पवईतील तीन दुर्गम आणि सुविधांपासून वंचित असलेल्या वस्त्यांमध्ये – भंगशील गाव, उलटनपाडा आणि इंदिरानगर – एकूण ५० सौर पथदिवे बसवण्यात आले आहेत. या भागात यापूर्वी रस्त्यांवरील प्रकाशाची सोय नव्हती. या दिव्यांमुळे सुमारे १२०० हून अधिक रहिवाशांना सुरक्षित आणि विनामूल्य प्रकाश उपलब्ध झाला आहे.
दुसऱ्या टप्प्यात, पवईतील महानगरपालिका शाळांमध्ये ७५ किलोवॅट क्षमतेचे ‘ऑन-ग्रिड’ सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत. याचा फायदा ५००० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांना होणार आहे. यामुळे शाळांच्या कार्बन फूटप्रिंटमध्ये घट होण्यासोबतच, भावी पिढीसमोर शाश्वत ऊर्जेचा आदर्श निर्माण झाला आहे.
३० एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाला बीएमसीचे कार्यकारी अभियंता शशिकांत मेमणे आणि ‘सोलर मॅन ऑफ इंडिया’ डॉ. सचिन शिगवण यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे (AWS) वरिष्ठ साजी पी.के. आणि आदित्य चौधरी यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा प्रकल्प ‘निर्मिती फाऊंडेशन’ आणि ‘ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह’ (GIIPL) यांच्या तांत्रिक सहकार्याने पूर्ण झाला आहे.
याप्रसंगी साजी पी.के. म्हणाले की, “आम्हाला या पहिल्या एकात्मिक सौर ऊर्जा मोहिमेचा भाग असल्याचा अभिमान आहे. हा प्रकल्प केवळ वीज देत नाही, तर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नवीन पिढीला प्रेरणा देतो.”
अॅमेझॉनने भारतात २०३० पर्यंत क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये १२.७ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा संकल्प केला असून, हा सौर प्रकल्प त्याच धोरणाचा एक भाग आहे. या उपक्रमामुळे पवईतील दुर्गम आणि सुविधांपासून वंचित असलेल्या वस्तीत राहणाऱ्या हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण झाला आहे.




No comments yet.