राज्यभर महाराष्ट्रदिन मोठ्या उत्सवात आणि गौरवात साजरा करण्यात आला. पवईमध्ये शिवतेज फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) तर्फे तिरंदाज व्हिलेज मनपा शाळा प्रांगणात दोन दिवस ‘शिव जागर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची छायाचित्रे, शिवकालीन नाणी ’सुवर्ण होन‘ आणि ’शिवराई‘ ’शंभुराई‘ ही चलन प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. तसेच स्वराज्यातील आरमारी जहाजांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. पवईसह मुंबईकरांनी या जागर कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते बाळासाहेब ठाकरे यांची संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील दुर्मीळ व्यंगचित्रांचे भव्य प्रदर्शन. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पुरक असणाऱ्या बाळासाहेबांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे हे प्रदर्शन लोकांना संयुक्त महाराष्ट्राच्या आठवणी ताजे करणारे आणि त्याचा इतिहास लोकांच्या मनात बिंबवणारे ठरले.
या कार्यक्रमाचे आयोजन अमोल चव्हाण यांनी केले होते. शिवसेना (उबाठा) शाखा १२२ चे शाखाप्रमुख सचिन मदने, विभाग अधिकारी युवासेना विजय कुरकुटे, सुरेखा चव्हाण हे कार्यक्रमाचे सल्लागार होते.
विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील राउत यांच्या हस्ते या कार्याक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “व्यंगचित्रांवरील लिखाण वाचत असताना महाराष्ट्रातील तत्कालीन स्थितीची कल्पना येते. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांना एकच मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यासाठी गुजरात राज्याने प्रयत्न केले. ते प्रयत्न हाणून पाडण्याचे प्रयत्न या व्यंगचित्रातून दिसत आहेत.”
ते पुढे म्हणाले, “शिवसेना आजही लोकांशी जोडली असल्याचा संदेश लोकांमध्ये गेला पाहिजे. दत्ता दळवी गेले, भंगार गेला. त्यांच्या जाण्याने फरक पडत नाही. जो पर्यंत बाळासाहेबांवर आणि उद्धवजीवर विश्वास ठेवणारी खालची फळी अत्यंत मजबूतपणे काम करत आहे, तो पर्यंत काही फरक पडत नाही. गेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला सर्व बाजूंनी हरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही २० आमदार निवडून आले. शिवसेना संपली नसून तसा प्रयत्न मात्र करण्यात आला. या पुढेही निष्ठेने काम करू सेनेचा गड राखू.”
No comments yet.