![](https://i0.wp.com/avartanpowai.info/wp-content/uploads/2020/02/murder.jpg?resize=389%2C259&ssl=1)
प्रातिनिधिक छायाचित्र
चांदिवली येथील खैरानी रोडवर भर रस्त्यात एका तरुणाने ३० वर्षीय तरुणीची चाकूने गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. तरुणी ही संघर्षनगर येथील रहिवाशी असून, दोघे रिक्षाने प्रवास करत असताना ही घटना घडली. तरुणीची गळा चिरून हत्या केल्यानंतर पलायन केलेल्या तरुणाने स्वतःवर देखील चाकूने वार करत स्वतःला जखमी करून घेतले आहे.
यासंदर्भात साकीनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय तरुणी पंचशीला जामदार ही आरोपी तरुण दिपक बोरसे याच्यासोबत रिक्षाने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान दोघांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाच्या रागातच तरुणाने अचानक चाकूने तरुणीचा गळाच चिरला, ज्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली. त्याच अवस्थेत तरुणीने रिक्षातून बाहेर निघत रस्त्याने चालण्याचा प्रयत्न केला मात्र काही अंतरावरच ती कोसळली.
सदर घटनेची माहिती रस्त्यावरून चालणाऱ्या प्रवाशांनी साकीनाका पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तरुणीला राजावाडी रुग्णालयात दाखल केले, मात्र तिचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
“हत्येनंतर तरुणाने पलायन करून स्वतःवर देखील त्याच चाकूने वार करून जखमी करण्याचा प्रयत्न केला. त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले असून, पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेतले आहे,” असे साकीनाका पोलिसांनी सांगितले.
दिवसाढवळ्या तरुणीची भररस्त्यात करण्यात आलेल्या हत्येमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. तरुणीची हत्या नेमकी का करण्यात आली आणि दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावरुन वाद सुरू होता? याचा सध्या साकीनाका पोलीस अधिक तपास करत आहेत.
No comments yet.