‘शर्माजी है ना’! नारा काम करून गेला
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निर्णय शुक्रवार, १६ जानेवारीला जाहीर झाले असून, पवईतील प्रभाग क्रमांक १२२ मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलले आहे. महायुतीचे उमेदवार चंदन शर्मा यांनी ११३२० मते मिळवत ५७६६ मताधिक्याने विजयी होत कमळ फुलवले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष युतीचे उमेदवार निलेश साळुंखे ५५५४ मते मिळवत दुसऱ्या स्थानावर, तर २०७१ मते मिळवत वंचित बहुजन आघाडी आणि कॉंग्रेस युतीचे उमेदवार विशाल खंडागळे तिसऱ्या स्थानावर राहिले.
मुंबई महानगरपालिकेच्या पवई प्रभाग क्रमांक १२२ मध्ये मैदानात उतरलेल्या उमेदवारांसाठी मंगळवारी झालेल्या मतदानात मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद देत ५०.२९% मतदान केले होते.
शुक्रवारी (१६ जानेवारीला) होणाऱ्या मतमोजणीत जनता कोणाच्या दिशेने कौल देणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सर्वांचेच डोळे आणि कान आपल्या परिसरातील विजयी उमेदवाराची बातमी ऐकायला आतुर होते. कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठी लगबग होती. मात्र यावर्षी गटा – गटात मतमोजणी होत असल्याने संध्याकाळी उशिरापर्यंत उत्कंठा ताणून राहिली होती.
अखेर १०.१५ वाजण्याच्या सुमारास मतमोजणी सुरु झाली आणि पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे उमेदवार यांनी आघाडी घेत शेवटच्या ५व्या फेरी अखेर ५७६६ मतांची आघाडी घेत चंदन चित्तरंजन शर्मा यांनी पवईमध्ये पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीन वेळा नगरसेवक राहिलेले चंदन चित्तरंजन शर्मा यांनी निवडणुकांच्या तोंडावर १८ डिसेंबरला कमळ हाती घेतले. शर्मा यांचा भाजपप्रवेश हा केवळ एक राजकीय बदल नसून पवईच्या राजकारणातील एका मोठ्या शक्तीचे स्थलांतर मानले जात आहे. चंदन शर्मा यांच्यासह त्यांच्या पत्नी चारू शर्मा यांनीही या भागाचे प्रतिनिधित्व केले आहे.



No comments yet.